Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

Monday, December 2, 2019

Monday, December 02, 2019

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीचे सुयश

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीचे सुयश

पिंपरी ता. मोर्शी ----आजच्या या कॉन्व्हेंट संस्कृती मध्ये गुणवत्ता पूर्ण शिक्षण हे फक्त खाजगी शाळेत किंवा कॉन्व्हेंट मध्येच मिळते असा एक समज दृढ झालेला आहे. पण या (गैर) समजाला फाटा देत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपरी येथील विद्यार्थिनीने घवघवीत यश प्राप्त करत एक नवीन विचार रुजविला आहे. गोरगरीब, सामान्य जनतेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांनी सुद्धा आता कात टाकली असून स्पर्धेच्या या युगात त्या सुद्धा मागे नाहीत. अशीच एक यशोगाथा आहे ती, कु. सोनम गंफू परिहार हिची. गणित अध्यापक मंडळ जिल्हा अमरावती तर्फे आयोजित गणित संबोध परीक्षा- सन-२०१९-२० मध्ये सोनमने इयत्ता ५ वी तून संपूर्ण मोर्शी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून जणू काही संदेश दिला आहे की, आम्ही Z.P ची मुलं कुठंही कमी नाही. तिने आपल्या यशाचे श्रेय तिची स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे वर्गशिक्षक श्री.महेंद्रसिंग सलामे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.गजानन ठाकरे आणि आईवडिलांना दिले.  

तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल शाळेतील शिक्षक सौ.पाटील, सौ.ठाकरे, श्री.देशमुख, श्री.सातपुते, श्री.राऊत आणि श्री.अंबाडकर ह्यांनी तिचे कौतुक केले असून भविष्यातील तिच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



त्याचप्रमाणे शिक्षण विभाग पंचायत समिती कार्यालय मोर्शीच्या वतीने कु.सोनम चे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी श्रीमती.अश्विनी पवार, विस्तार अधिकारी श्री.बडवाईक सर व अंबाडा केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती.गाडे ह्यांनी केले आहे.
 

Thursday, November 21, 2019

Thursday, November 21, 2019

सन्मान प्रेरणेचा .......सन्मान गुणवत्तेचा


प्रिय,
शिक्षक बंधू आणि भगिनी

   बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये शिक्षण क्षेत्रात काम करणारे आपण सर्व जण आपल्या अधिनस्त  विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोतच.आणि आपण सर्व जण त्या साठी प्रयत्नशील सुद्धा आहोतच ह्यात शंका नाही. पण दिवसेंदिवस वाढत जाणारा कामाचा विस्तार जरी तो कालानुरूप अपरिहार्य असला तरीही मात्र कामाची दिशा, जवळ असणारी वेळ आणि उपलब्ध साधन स्रोत ह्याचा ताळमेळ जुळवतांना आपल्या सर्वांच्या नाकी नऊ येतात.आपल्या व्यवस्थेत काम करणाऱ्यांचा हा अनुभव आहे.आणि मग अश्यावेळी नेमकी आपली ही शिक्षण व्यवस्था ज्या मुलांसाठी काम करते त्या मुलांना आपण पुरेसं देऊ शकलो नाही अशी खंत मनी उरते.

मात्र जगात जिला समस्या नाही अशी व्यक्ती नाही,आणि जिचे समाधान नाही अशी समस्या अस्तित्वात नाही.त्या साठी उपलब्ध साधन स्रोत, जवळ असणारी वेळ,आपल्या समस्येचं स्वरूप या सर्वांच नीट आकलन करून उद्दिष्टाप्रत  पोहचता येतं.

अश्याच नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आपणा सर्वांना दिशादर्शक,नियोजन पूर्ण एक कृतीकार्यक्रम अमरावती जि. प. शिक्षण सभापती  मा.श्री.जयंतराव देशमुख  ह्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला आहे.

सन २०१८-१९ पासून अमरावती जि. प अंतर्गत शाळांसाठी सन्मान प्रेरणेचा-सन्मान गुणवत्तेचा  हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मी माझ्या शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने नेमकं काय करायला हवं ह्याचं  दिशादर्शन ह्यात केलेलं आहे. गुणवत्तेला स्पर्श करणाऱ्या सर्वांगाचा समावेश ह्यात करण्यात आलेला असून जी साधनं आपल्या जवळ उपलब्ध आहे,आवाक्यात आहे त्याद्वारे आपल्याला आपल्या उद्दीष्टापर्यंत नेणारे आहे.
 सन्मान प्रेरणेचा-सन्मान गुणवत्तेचा हा कृती कार्यक्रम आपणा सर्वाना निश्चितच मार्गदर्शक ठरून पं. स.मोर्शी अंतर्गत शाळांना खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शाळा करण्यासाठी उपयुक्त ठरेल ,आणि आपण सर्वजण ह्या कार्यक्रमात मनापासून सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करते.

सर्व शाळांना सन्मान प्रेरणेचा- सन्मान गुणवत्तेचा या कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐💐
              ग.शि.अ
              पं. स मोर्शी

सोबत सन्मान प्रेरणेचा - सन्मान गुणवत्तेचा प्रपत्र बघण्यासाठी  क्लिक करा.

Monday, August 26, 2019

Monday, August 26, 2019

यशोगाथा लोकसहभागाची-----जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड

यशोगाथा लोकसहभागाची





जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड💐💐💐💐💐

आपल्या शाळांमध्ये भौतिक सुविधा असाव्यात असं कुणाला वाटत नाही ? भौतिक सुविधांमुळे विद्यार्थ्यांना सोयी सुविधा तर मिळतातच पण, शाळेचं  बाहयरुप सुद्धा खुलून दिसतं. विद्यार्थी शिक्षक जिथे सहा- सात तास राहतात, तिथे त्यांना मनापासून आनंदानं राहावसं वाटतं.
शाळांमध्ये असावी अशी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे  हॅण्ड वॉश स्टेशन. कुणाला वाटत नाही  की,माझ्या शाळेमध्ये हँडवॉश स्टेशन असावं? त्यातून विद्यार्थ्याला स्वच्छतेचे संस्कार आपसुकच मिळतात. RTEअंतर्गत शाळेच्या दहा निकषांमध्ये म्हणूनच हॅण्डवॉश  स्टेशन समाविष्ट केले गेले आहे. निरामय आरोग्याची सुरुवात स्वच्छ हातांपासून होते आणि अभ्यासातील प्रगती आणि आरोग्याचा सहसंबंध सर्वमान्य आहेच.

गाव करी ते राव न करी, या उक्तीप्रमाणे लोकसहभागाचे महत्त्व सर्वश्रुत आहेच. अशाच एका यशस्वी लोकसहभागाची कथा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, हिवरखेड येथे उभं राहिलेलं  हॅण्ड वॉश  स्टेशन. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये  hand wash station ची  संकल्पना सर्व संमत करण्यात आली. पण पैसा कसा उभारायचा? ही अडचण सर्वांसमक्ष उभी ठाकली. मग या  hand wash स्टेशनसाठी तर एक भन्नाट कल्पना सुचवण्यात आली. याकरीता शाळेतच मंदिरांप्रमाणे दानपेटीत ठेवण्यात आली. दरवर्षी दानपेटी जुलै महिन्यात फोडण्यात येत असे.पण त्यातूनही पुरेसा निधी उभा राहिला नाही. अशा वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. गोपालभाऊ मडघे त्याचप्रमाणे गावातील काही शिक्षणप्रेमी मंडळी यांनी भरघोस दान देऊन जवळपास तीस हजार रुपये निधी जमा केला. चांगल्या कार्यास परमेश्वराचं सहाय्य असतं असं म्हणतात, त्याचप्रमाणे गावातील श्री. नंदकिशोर गांधी यांनी या हॅण्डवॉश स्टेशन ला टाईल्स दिल्या. आणि एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे हँडवॉश स्टेशन उभे राहीले....
लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं .
आणि या पंधरा ऑगस्टला पंचायत समिती सदस्या मा.सौ मायाताई वानखडे, सरपंच श्री. विजयभाऊ पाचारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री गोपालभाऊ मडके, गावकरी मंडळी पालक यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॅण्ड वॉश स्टेशन चा उद्घाटनीय सोहळा पार  पडला. आता हे हॅण्ड वॉश  स्टेशन विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू झालेले आहे.

ऋणनिर्देश🙏🙏

या विद्यार्थी उपयोगी hand wash station करिता समाजातील ज्या सर्व दानशूर व्यक्तींचे सहकार्य लाभले,त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन  💐💐


Wednesday, August 21, 2019

Wednesday, August 21, 2019

शाळा तेथे शेवगा





गुणवत्ता विकासासाठी एक प्रयत्न.......शेवगा लागवड
शरीर माध्यम खलू धर्म साधनम.
      भारतीय उपनिषदांमधून वरील सुभाषित   उद्धृत केलेले आहे. सुदृढ शरीराद्वारेच सर्व गोष्टींची उपलब्धी केली जाऊ शकते, किंबहुना जर शरीर सुदृढ नसेल तर काहीच करण्यात आपले मन लागत नाही. उपाशीपोटी शिक्षण कसे घेणार? याच संकल्पनेतून माध्यान्ह भोजन योजनेची सुरवात झाली.शाळा-शाळांतून किचन शेड उभी राहली, दुपारची  जेवणं सुरु झाली.आणि याचे परिणाम आपण बघतोय. विद्यार्थी पट नोंदणी- उपस्थिती ते शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर माध्यान्ह भोजन योजनेचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतोय.
      शासन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सकस,दर्जेदार माध्यान्ह भोजन देण्यास प्रयत्नशील आहेच परंतु वैयक्तिक रित्या शाळास्तरावर यासाठी काय करता येईल? यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभाग, अमरावतीचे लेखाधिकारी मा.श्री अमोल ईखे यांनी जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार अधिक्षकांसमोर एक अभिनव प्रस्ताव मांडला तो म्हणजे शाळेतच शेवगा रोप लागवड करणे.  मोर्शी पं.स. च्या गटशिक्षणाधिकारी तथा शा.पो.आ.अधिक्षक अश्विनी पवार यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देेेऊन तालुक्यातील सर्व शाळांना प्रेेरीत केले.
गुणकारी शेवगा रोपांची लागवड करण्यास मोर्शी पंचायत समिती अंतर्गत शाळांमध्ये सुरवात करण्यात आलेली आहे. आजमितीला सुमारे 40 शाळांमध्ये शेवगा लागवड करण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमती अश्विनी पवार यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपण शाळेतीलच शा.पो.आ. स्वयंपाकी आणि मदतनीस ह्यांच्या हस्ते करण्यात आले आहे, जेणेकरून ही रोप जगविण्याची आणि वाढविण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी त्यांची. आमच्याही हस्ते वृक्षारोपण घेण्यात आले ही सन्मानाची भावना.
शाळा निहाय मागणीनुरूप प्रत्येक शाळेला रोप पुरविणे याचे सर्व नियोजनाचे श्रेय जाते श्री. सूरज अंबाडकर, सहा. शिक्षक जि.प.पूर्व माध्य.शाळा, पिंपरी यांना!






शेवगा वृक्षारोपना काही क्षणचित्रे


लागवड करण्यात आलेली रोप ही कृषी विभागामार्फत कर्नाटक येथून बोलाविण्यात आलेली असून ह्या रोपांना सहा एक महिन्यात फलधारणा होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या शेंगा खाण्यास गोड आहेत. रोप उपलब्ध करून दिल्याबद्दल उमरखेड येथील रोपवाटिकेचे कृषिअधिकारी श्री.वानखडे साहेब ह्यांचे शिक्षण विभागातर्फे  आभार.

🌿शेवग्याचे महत्त्व🌿

 शेवग्याचे झाड लावणे आणि त्याची मशागत करणे अगदी सोपे आहे. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते . शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारी वृक्ष असे म्हटलेले आहे.

साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.

शेवग्याचे आरोग्यदायी फायदे:

💐शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते. शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी एन्टीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी करण्यास  मदत होते.

💐शेवग्याच्या पानांबरोबरच शेवग्याच्या शेंगाही आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे सांबारमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा निरनिराळ्या डाळींच्या वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.

💐शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. घसा खराब असल्यास किंवा ब्रॉन्कायटीस चा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेले सूप प्यायल्याने आराम मिळतो. गर्भवती महिलांनी शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये असलेली पोषक तत्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी आहेत. या शेंगांमध्ये असलेली बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे (नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

💐शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्व 'बी' हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.
 
💐मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.

💐शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.
आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते.
शेवग्याच्या फुलांची भाजी हि संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते.
शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यामुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो.
शेवग्याच्या सालीचा वास उग्र असतो.शेवग्याच्या सालीचा काढा हा रोगात वापरतात.

💐अग्निदिपनासाठी शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या स्वरूपात जेवणात करतात शेवग्यामुळे पोटात आग पडते. मिरे आणि मोहरी यांच्याप्रमाणे शेवग्यामुळे विदाह होतो. हे पदार्थ वारंवार खाण्याने पित्त व रक्त बिघडते आणि. (नाक, तोंड, गुद, मुत्र) शरीरातून रक्त बाहेर येते.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) झालेल्या रोग्यांसाठी प्रशस्त आहे.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू झालेल्या रोग्यांसाठी फायदेशीर ठरतो
शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी.

💐कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण करून कानात घालावे.
गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते.
पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.
शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते.
शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.
शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या त्रासामध्ये आराम मिळतो आणि प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात.

💐शेवग्यामध्ये जीवनसत्व 'ए' असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते तसेच डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.
चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे.
शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते.

श्री. मोहम्मद शरीफ, डॉ. आर. बी. क्षीरसागर व शेख उज्मा ए.
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
shareef.foodtech@gmail.com(कडून साभार)


तर आपल्याही शाळेत आपण शेवगा रोप  लावूया,जगवूया आणि शालेय पोषण आहाराचं पोषण मूल्य वाढवूया.
   एक छोटासा प्रयत्न....अशा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच बरंच काही बदलतं...... चला तर मग एक नवी सुरवात करूया.
          धन्यवाद🙏🙏

Wednesday, August 7, 2019

Wednesday, August 07, 2019

जि.प प्रा.शाळा खेड आणि जि.प.उ.प्रा शाळा दापोरी येथील नाविन्यपूर्ण उपक्रम......

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आधार - प्रत्यक्ष अनुभवातून करूया साकार



     मोर्शी पं.स.अंतर्गत येणाऱ्या जि.     प.प्रा.शाळा खेड येथे दि.5/08/2019   ला विद्यार्थी सहकारी बचत बँक आणि   शालेय वस्तू भांडार चा  उद्घाटन सोहळा खालील मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
 या  कार्यक्रमाला
     मा.श्री.सारंगभाऊ खोडस्कर (सदस्य,जि.प.अमरावती),
     मा.श्री.रमेशभाऊ खातदेव (उपसभापती,पं.स   मोर्शी),
     मा.श्रीमती  अश्विनीताई पवार (गटशिक्षणाधिकारी पं. स. मोर्शी),
     मा.श्री सुनीलभाऊ कडू (सदस्य,पं. स.मोर्शी) त्याचप्रमाणे सन्मानीय शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी,पालक वर्ग आदी मान्यवर मंडळी हजर होती.

        

त्याचप्रमाणे जि.प.उच्च प्रा. शाळा दापोरी येथेसुद्धा अशाच नाविन्यपूर्ण  अभिनव उपक्रमांची सुरवात करण्यात आलेली आहे. शिक्षणशास्त्रात म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अध्ययन-अनुभव जेवढी अस्सल असतील तेवढी ती दर्जेदार आणि परिणामकारक ठरतात. मुलं या उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेऊन स्वतःच स्वतः शिकतो.

या उपक्रमाची उद्दीष्टे

1)-विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा संबंध दैनंदिन जीवनाशी जोडता येणे.

2)-बचतीची सवय लागणे,पैशाचा विनिमय करता येणे.

3)-बँकेच्या व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव येणे.

4)-बँक व्यवहाराशी संबंधित पारिभाषिक शब्दांचा( उदा.डेबिट-क्रेडिट)परिचय होणे.

5)-गणितीय क्रियांची समज येते.शाब्दिक उदाहरणातील क्रिया कळण्यास मदत होते.

6)-शालेय साहित्य भांडारद्वारे ग्रामीण भागातील मुलांना वेळेवर  लेखन साहित्य उपलब्ध होते.सहभागी विद्यार्थ्याला नफा-तोटा हा संबोध प्रत्यक्ष कळतो.

फलश्रुती  

1)-विद्यार्थी स्वतः कृतीयुक्त सहभाग घेतो त्यामुळे त्याला आंनद मिळतो.

2)-विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया घडून येते,त्यांच्यामधील समन्वय वाढीस लागतो.

3)- अशा उपक्रमामुळे शाळा-विद्यार्थी नाते दृढ होण्यास मदत होते.

शाळेतील सर्व विद्यार्थी मनापासून आणि आनंदाने अश्या उपक्रमात सहभागी होतात हे वेगळे सांगावयास नको.
   असे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक कार्यास अनंत शुभेच्छा....💐💐💐