Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

Wednesday, August 21, 2019

शाळा तेथे शेवगा





गुणवत्ता विकासासाठी एक प्रयत्न.......शेवगा लागवड
शरीर माध्यम खलू धर्म साधनम.
      भारतीय उपनिषदांमधून वरील सुभाषित   उद्धृत केलेले आहे. सुदृढ शरीराद्वारेच सर्व गोष्टींची उपलब्धी केली जाऊ शकते, किंबहुना जर शरीर सुदृढ नसेल तर काहीच करण्यात आपले मन लागत नाही. उपाशीपोटी शिक्षण कसे घेणार? याच संकल्पनेतून माध्यान्ह भोजन योजनेची सुरवात झाली.शाळा-शाळांतून किचन शेड उभी राहली, दुपारची  जेवणं सुरु झाली.आणि याचे परिणाम आपण बघतोय. विद्यार्थी पट नोंदणी- उपस्थिती ते शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर माध्यान्ह भोजन योजनेचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतोय.
      शासन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सकस,दर्जेदार माध्यान्ह भोजन देण्यास प्रयत्नशील आहेच परंतु वैयक्तिक रित्या शाळास्तरावर यासाठी काय करता येईल? यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभाग, अमरावतीचे लेखाधिकारी मा.श्री अमोल ईखे यांनी जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार अधिक्षकांसमोर एक अभिनव प्रस्ताव मांडला तो म्हणजे शाळेतच शेवगा रोप लागवड करणे.  मोर्शी पं.स. च्या गटशिक्षणाधिकारी तथा शा.पो.आ.अधिक्षक अश्विनी पवार यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देेेऊन तालुक्यातील सर्व शाळांना प्रेेरीत केले.
गुणकारी शेवगा रोपांची लागवड करण्यास मोर्शी पंचायत समिती अंतर्गत शाळांमध्ये सुरवात करण्यात आलेली आहे. आजमितीला सुमारे 40 शाळांमध्ये शेवगा लागवड करण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमती अश्विनी पवार यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपण शाळेतीलच शा.पो.आ. स्वयंपाकी आणि मदतनीस ह्यांच्या हस्ते करण्यात आले आहे, जेणेकरून ही रोप जगविण्याची आणि वाढविण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी त्यांची. आमच्याही हस्ते वृक्षारोपण घेण्यात आले ही सन्मानाची भावना.
शाळा निहाय मागणीनुरूप प्रत्येक शाळेला रोप पुरविणे याचे सर्व नियोजनाचे श्रेय जाते श्री. सूरज अंबाडकर, सहा. शिक्षक जि.प.पूर्व माध्य.शाळा, पिंपरी यांना!






शेवगा वृक्षारोपना काही क्षणचित्रे


लागवड करण्यात आलेली रोप ही कृषी विभागामार्फत कर्नाटक येथून बोलाविण्यात आलेली असून ह्या रोपांना सहा एक महिन्यात फलधारणा होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या शेंगा खाण्यास गोड आहेत. रोप उपलब्ध करून दिल्याबद्दल उमरखेड येथील रोपवाटिकेचे कृषिअधिकारी श्री.वानखडे साहेब ह्यांचे शिक्षण विभागातर्फे  आभार.

🌿शेवग्याचे महत्त्व🌿

 शेवग्याचे झाड लावणे आणि त्याची मशागत करणे अगदी सोपे आहे. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते . शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारी वृक्ष असे म्हटलेले आहे.

साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.

शेवग्याचे आरोग्यदायी फायदे:

💐शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते. शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी एन्टीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी करण्यास  मदत होते.

💐शेवग्याच्या पानांबरोबरच शेवग्याच्या शेंगाही आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे सांबारमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा निरनिराळ्या डाळींच्या वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.

💐शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. घसा खराब असल्यास किंवा ब्रॉन्कायटीस चा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेले सूप प्यायल्याने आराम मिळतो. गर्भवती महिलांनी शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये असलेली पोषक तत्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी आहेत. या शेंगांमध्ये असलेली बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे (नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

💐शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्व 'बी' हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.
 
💐मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.

💐शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.
आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते.
शेवग्याच्या फुलांची भाजी हि संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते.
शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यामुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो.
शेवग्याच्या सालीचा वास उग्र असतो.शेवग्याच्या सालीचा काढा हा रोगात वापरतात.

💐अग्निदिपनासाठी शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या स्वरूपात जेवणात करतात शेवग्यामुळे पोटात आग पडते. मिरे आणि मोहरी यांच्याप्रमाणे शेवग्यामुळे विदाह होतो. हे पदार्थ वारंवार खाण्याने पित्त व रक्त बिघडते आणि. (नाक, तोंड, गुद, मुत्र) शरीरातून रक्त बाहेर येते.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) झालेल्या रोग्यांसाठी प्रशस्त आहे.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू झालेल्या रोग्यांसाठी फायदेशीर ठरतो
शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी.

💐कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण करून कानात घालावे.
गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते.
पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.
शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते.
शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.
शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या त्रासामध्ये आराम मिळतो आणि प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात.

💐शेवग्यामध्ये जीवनसत्व 'ए' असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते तसेच डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.
चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे.
शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते.

श्री. मोहम्मद शरीफ, डॉ. आर. बी. क्षीरसागर व शेख उज्मा ए.
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
shareef.foodtech@gmail.com(कडून साभार)


तर आपल्याही शाळेत आपण शेवगा रोप  लावूया,जगवूया आणि शालेय पोषण आहाराचं पोषण मूल्य वाढवूया.
   एक छोटासा प्रयत्न....अशा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच बरंच काही बदलतं...... चला तर मग एक नवी सुरवात करूया.
          धन्यवाद🙏🙏

No comments: